छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेबारामतीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

अंत्यसंस्कारानंतर अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्याचा विधी सकाळी पार पार

बारामती / प्रतिनिधी

अंत्यसंस्कारानंतर आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात सकाळी हा विधी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः उपस्थित होते. त्यांनी अजित पवारांच्या अस्थींचे दर्शन घेतले. या वेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य आणि निकटवर्तीय कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात शोक आणि शांतता जाणवत होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, गुरुवारी दुपारी बारामतीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दुपारी १२ वाजता हा अंत्यविधी पार पडला. शासकीय इतमामात बंदुकीच्या सलामीसह त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवार यांच्या जाण्याने राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेले वातावरण अत्यंत भावनिक होते.

अंत्यसंस्काराच्या वेळी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायक होता. कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते आणि राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो लोकांनी डोळ्यात अश्रू ठेवत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. बारामती परिसरात शोककळा पसरली होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया स्पष्ट दिसत होती.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने यापूर्वीच अपघातस्थळी जाऊन आवश्यक नमुने गोळा केले असून, ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने केला जाणार आहे.

सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, सदर विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी पहिल्यांदा बारामती विमानतळाच्या संपर्कात आले होते. एटीसीकडून वैमानिकांना त्या वेळी वाऱ्याचा वेग कमी असून दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पायलटने आपण रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे कळवले. मात्र, त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला सांगितले.

यानंतर पायलटने रनवे दिसू लागल्यावर कळवतो असे सांगितले. सकाळी ८.४३ वाजता रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी पूर्णतः सज्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले. एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून, त्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!